
जळगाव, दि. १३ जून : आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने सुरू असलेल्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पामुळे राज्य महामार्ग क्रमांक ४४ वरील भुसावळ-फैजपूर मार्ग १७ जून २०२६ ते १६ जुलै २०२६ या कालावधीत तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१)(ब) अन्वये यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका भुसावळ शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करणाऱ्या यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महिनाभरासाठी वाहतूक बंद
राज्य महामार्ग क्रमांक ४४ वरील रस्ते सुधारणा कामामुळे भुसावळ-फैजपूर मार्गावरील वाहतूक १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
फैजपूर – हंबर्डी – हिंगोणा – सांगवी – चिंतोडा – वावळ – भुसावळ
हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
फैजपूर – हंबर्डी – भालोद – चिखली – अंजाळे – भुसावळ
विद्यार्थ्यांसमोर वाढत्या अडचणी
सोमवार पासून शाळा सुरू होणार असून, या वाहतूक बदलाचा परिणाम विशेषतः यावल तालुक्यातील पाडळसा, बामणोद, विनोदी, कोसगाव, भालोद, आमोदा, पिंपरूड, विरोदा आणि न्हावी या गावांमधून भुसावळ येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार असल्याचा दावा केला जात आहे.
भुसावळ शहरातील महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, आयटीआय, खासगी कोचिंग क्लासेस तसेच विविध शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी दररोज एसटी बस किंवा खासगी वाहतुकीवर अवलंबून आहेत. पर्यायी मार्गामुळे प्रवासाचे अंतर वाढणार असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मासिक बस पासच्या भाड्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत पोहोचण्याचे आव्हान
पर्यायी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी अधिक लवकर घराबाहेर पडावे लागणार आहे. बसच्या फेऱ्या उशिरा झाल्यास शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत पोहोचणे अवघड होणार असून, नियमित उपस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो, अशी भावना पालक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
काही पालकांच्या मते, ऐन पावसाळ्यात महिनाभर सुरू राहणाऱ्या या बदलामुळे विद्यार्थ्यांची दिनचर्या विस्कळीत होऊन अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शालेय व महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक, अतिरिक्त वर्ग आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्ह्यातील वृत्तपत्रांना या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, रस्ते सुधारणा प्रकल्पामुळे तात्पुरता त्रास सहन करावा लागणार असला, तरी भविष्यात वाहतूक अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष बस फेऱ्या, बस पासमध्ये सवलत किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.













